औरंगाबादचे मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय व ग्रामीण च्या पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची सुंदर प्रेमकथा सांजवार्ता प्रतिनिधीने मोक्षदा यांच्या कडून जाणून घेतली.
मोक्षदा व आस्तिक यांची पहिली भेट मसुरीच्या लाल बहादुर शास्त्री नॅशनल अकॅडमीत प्रशिक्षणादरम्यान झाली.२०११ मध्ये ३ महिन्यांच्या फाऊंडेशन कोर्स मध्ये दोघे बॅचमेट्स होते. दोघांचेही युपीसीचे ऑप्शनल विषय सारखे होते. त्यामुळे बोलण्यासारखे खूप विषय दोघांकडे कायमच असायचे.अभ्यास, साहित्य, इतिहास, पुस्तक वाचनावरचे प्रेम या गोष्टींनी दोघांना जवळ आणले. हळुहळू दोघांना बोलण्यासाठी वेळहि पुरेणासा झाला. समान विचार आणि समान आवडी निवडी यामुळे यांच्यात एकप्रकारची जवळीक निर्माण झाली. मोक्षदा यांचे वडील अकॅडमीत त्यांना भेटण्यासाठी आले त्यावेळी आस्तिक त्यांना जाऊन भेटले व ' माझे मोक्षदा वर प्रेम आहे , तिच्याशिवाय मी नाही राहु शकत ' अशी कबुली दिली. त्यांच्या वडिलांनी सर्व चौकशी केली, त्यांची योग्य ती माहिती घेऊन लग्नाला होकार दिला. व २८ एप्रिल २०१२ ला मोक्षदा पाटील व आस्तिक कुमार पांडेय प्रेमाच्या पवित्र अशा विवाहबंधनात अडकले. मुळच्या जळगावच्या असल्या तरीही मोक्षदा यांचे पूर्ण आयुष्य हे मुंबईतच गेले. तर आस्तिक हे युपीतील लखनौचे आहेत. दोघांच्या भाषा, संस्कृती, राज्य पूर्णत: भिन्न तरीही प्रेमाच्या एका धाग्याने दोघांना जवळ आणले. 'आमची संस्कृती वेगळी असली तरी सर्वात पहिले आम्ही ऑफीसर्स आहोत, आणि हेच आमच्यासाठी महत्त्वाचे आहे ' असे मोक्षदा यावेळी म्हणाल्या. जातीव्यवस्था, वर्णद्वेष या गोष्टींच्या दोघेही ठाम विरोधात आहेत असेही त्या यावेळी म्हणाल्या.
महाराष्ट्रात आज आपण पाहतो अनेक अल्पवयीन तरुण तरुणी घरच्यांच्या दबावामुळे पळुन जाऊन प्रेमविवाह करतात, यात जाती व्यवस्थेमुळे तर कित्येकांना जीवही गमवावे लागले आहेत.अशा तरुणाईला मोक्षदा सांगतात, ' तुमचे प्रेम सक्सेसफुल होण्यासाठी आधी तुम्ही सक्सेसफुल होणे गरजेचे आहे '.
मोक्षदा पाटील व आस्तिक कुमार पांडेय यांचा हा प्रेमविवाह जरी असला , त्यांची संस्कृती, जाती जरी भिन्न असल्या तरीही आज त्यांनी स्वत: चे जे स्थान निर्माण केले आहे ,आज ज्याठिकाणी ते आहेत त्यामुळे या गोष्टींनी त्यांच्या नात्यात कधीही कुठलाच अडसर आणला नाही.
आज दोघेही आपापल्या कार्य क्षेत्रांमध्ये उंच भरारी घेतांना दिसतात. मात्र प्रशासनात काम करतांना दोघांनाही अनेक समस्या, प्रेशर, अडचणी,टेन्शन्सला सामोरे जावे लागते. अशा अनेक गोष्टी असतात ज्या ते घरच्या मंडळींना, मित्रपरिवाराला नाही सांगु शकत. अशावेळी दोघेही एकमेकांसोबत आपले प्रॉब्लम्स शेअर करतात.यावेळी मोक्षदा म्हणाल्या, मला कोणीही समजून नाही घेतले तरी मला विश्वास आहे कि आस्तिक मला नक्कीच समजून घेतील व आस्तिक यांना सुद्धा कोणी त्यांच्या मागे उभे नसले तरीही मोक्षदा त्यांच्या मागे असेल ' हा विश्वास आहे. या धावपळीच्या दिनक्रमात एकमेकांना वेळ कसा देतात यावर अगदी दिलखुलासपणे उत्तर मोक्षदा यांनी दिले, ' आम्ही नेहमीच एकमेकांच्या विचारात असतो , मला ठाम विश्वास आहे कि मी नेहमी त्यांच्या मनात असते ' .
जेव्हा हि मोकळा वेळ मिळतो तेव्हा दोघेही आपल्या मुलासोबत, परिवारासोबत ,स्टाफसोबत तो घालवायला प्राधान्य देतात. मोक्षदा व आस्तिक दोघेही आज ज्या प्रोफेशन मध्ये आहेत तिथे प्रत्येक दिवसच त्यांच्यासाठी एक खडतर आव्हान असतो, नव्या समस्या, अनेक किचकट गोष्टी तरीही एकमेकांशी बोलून त्यांना हलके वाटते. पुढे मोक्षदा म्हणाल्या, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये फक्त नवरा आणि बायको हे एेवढेच नाते नसते तर आस्तिक हे नाव घेतल्यावर माझ्या डोळ्यासमोर आमचा दोघांचा पूर्ण परिवार,आमचा मुलगा आयमान,आमचा स्टाफ हे सगळेच येतात. हिरा हा जसा अंगठीमध्ये जडवला जातो तसे आमचे नाते आहे आम्ही एकच आहोत असे मला वाटते ' . या व्हॅलेन्टाईन डे निमित्त आस्तिक यांना त्यांनी संदेश दिला तो असा " मला तु, आणि तुला मी बस्स " ...