औरंगाबाद: कन्नड तालुक्यातील टाकळी (अंतूर) ग्रामपंचायतअंतर्गत १ कोटी ३१ लाख रुपये खर्च करून राष्ट्रीय पेयजल योजनेतील अपूर्ण व दर्जाहीन काम ताब्यात घेऊन सरपंच, ग्रामसेवक व राष्ट्रीय पेयजल योजनेच्या अधिकार्यांनी शासनाच्ळा निधीचा अपहार केला. त्यांची चौकशी करावी व ग्रामस्थांचा पाणीप्रश्न मार्गी लागावा यासाठी नव्याने उपाययोजना कराव्यात यासाठी ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उद्या दि. १५ जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत.
राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत टाकळी (अं.) ग्रामपंचायतअंतर्गत १ कोटी ३१ लाख रुपये खर्च करुन विहीर खोदकाम, पंपहाऊस, वीजपुरवठा विहीर ते पाणीपुरवठा टाकीपर्यंत पाईपलाईन व पाण्याच्या टाकीपासून गावामध्ये पाणी वितरण करणारी पाईपलाईन टाकणे आदी कामे करण्यात आली. या सर्व कामांमध्ये संबंधित ठेकेदाराने सरपंच, ग्रामसेवक व राष्ट्रीय पेयजल योजना अधिकार्यांशी संगनमत करुन अंदाजपत्रकाला खोडा देऊन काम केले. विहीर खोदकाम १४ फूट अपूर्ण आहे. विहिरीशेजारी पंपहाऊस नाही. पाईपलाईन निर्धारित आकार व वजनाची नाही. पाण्याच्या टाकीचे संरक्षण कठडे व जिना लागलीच जमीनदोस्त झाला. वॉल्व्ह सध्याच लिकेज झाले आहेत. वीजपुरवठा खांब टाकून करायला हवा होता. तसे न करता केबल टाकून विद्युत पुरवठा घेण्यात आला आहे. पाईपलाईनचे खोदकामही वरवर आहे. अशा अनेक बाबी समोर आल्या आहेत. याबाबत ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले होते. त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना चौकशीचे आदेश पत्र दिले होते;परंतु चौकशी न केल्याने ग्रामपंचायत सदस्य भिकन वाघ तसेच प्रभू सपकाळ, ज्ञानेश्वर निकम, कृष्णा सोनवणे, पंढरीनाथ सपकाळ, रामकृष्ण काळे, तुकाराम सपकाळ यांच्यासह ग्रामस्थांनी जि.प. कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यावेळी सीईओंनी 15१५ दिवसांत चौकशी करतो, असे आश्वासन दिले होते. त्यास दोन महिने उलटून गेले तरी चौकशी झाली नाही म्हणून ग्रामस्थांनी १५ जुलैपासून कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे