औरंगाबाद: वरूण राजाने गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात जोर धरला असला तरी अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ७० टक्के पाऊस झाला. जालन्यातही पावसाने चांगली हजेरी लावली मात्र धरणक्षेत्रात पाऊस न पडल्याने मराठवाड्यातील दहा धरणे अद्यापही कोरडीठाक आहेत. तर निम्न दुधना, येलदरी, पेनगंगा या तीनच धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे.
मान्सून लांबल्याने यावर्षी जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून चांगल्या पावसाला सुरुवात झाली. गेल्या आठवडाभरात जालना औरंगाबाद यासह काही जिल्ह्यात चांगली हजेरी लावली. गतवर्षीची तूट लक्षात घेतात मराठवाड्यातील सर्व धरणांची पातळी जोत्याखाली आलेली आहे. त्यामुळे ही तूट भरून काढण्यासाठी धरण क्षेत्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडणे आवश्यक आहे. आजपर्यंत केवळ निम्न दुधना धरणात आतापर्यंत २.४७ दलघमी पाण्याची आवक झाली. येलदरी धरणात १०.०६, पेनगंगा ४.८१ दलघमी या तीनच धरणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाण्याची आवक सुरू झाली आहे. जायकवाडी सह सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा, विष्णुपुरी, सीना-कोळेगाव, शहागड बंधारा, खंडका बंधारा ही दहा धरणक्षेत्रे अजूनही ही पावसाच्या प्रतीक्षेत आहे.