औरंगाबाद : गेल्या आठवडाभरापासून विश्रांती घेतलेल्या वरूण राजाचे कधी आगमन होते या चिंतेने शेतकर्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. पेरणी होऊन दोन आठवड्यांचा कालावधी लोटला आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या चांगल्या पावसाने पिकांची उगवणही चांगली झाली. मात्र, गेल्या आठवडाभरापासून पाऊस गायब झाल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे.
या वर्षी मान्सून उशिराने दाखल झाल्यामुळे खरीप हंगामाची पेरणी लांबली होती. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात पावसाने जोर धरला त्यामुळे खरीप पेरण्यांना प्रारंभ झाला. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. गेल्या आठ दिवसांपासून मराठवाड्यातील कोणत्याच जिल्ह्यात पावसाचे आगमन झालेले नाही. त्यामुळे शेतकर्यांची चिंता वाढली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज आणि उद्या जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील परभणी, बीड, औरंगाबाद, जालना या जिल्ह्यांमध्ये पावसाचे आगमन होऊ शकते. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला तर शेतकर्यांची चिंता दूर होईल, असे बोलले जाते. उष्णतेत झाली वाढ
पाऊस गायब झाल्याने गेल्या काही दिवसात उष्णतेत ही मोठी वाढ झाली आहे. काल तर सर्वाधिक उष्ण तापमान नोंदले गेले. काल कमाल तापमान 34.9 तर किमान 21.6 एवढे नोंदले गेले. गेल्या तीन-चार आठवड्यात सर्वाधिक तापमान काल राहिले. त्यामुळे नागरिक उकाड्याने त्रस्त झाले होते. आजही सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे तापमान काहीसे कमी झाल्याचे दिसते आज सकाळी साडेअकराच्या सुमारास कमाल तापमान 22.3 अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले.