औरंगाबाद : जून महिना लागून तीन आठवडे उलटले आहेत. पावसाळा सुरू होऊन पंधरा दिवस उलटले आहे. या पंधरा दिवसात मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झालेले नाही. हवामान खाते दररोज नवनवीन अंदाज सांगत आहे. मान्सूनचे आगमन लांबल्याने शेतकर्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील पेरण्या खोळंबल्या आहेत. गतवर्षी पेक्षाही भयावह परिस्थिती निर्माण होते की काय अशी भीती आता वाटू लागली आहे.
गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडत आहे. गतवर्षी राज्यातील १५९ तालुक्यांत तर अत्यंत कमी पाऊस पडला. त्यामुळे राज्य सरकारला दुष्काळ जाहीर करावा लागला. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी योग्य नियोजन केले. ग्रामीण भागात मनरेगाची कामे सुरू केली. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था केली. गुराढोरांसाठी चारा छावण्या सुरू केल्या. जून महिन्यात दरवर्षी पावसाळ्याला सुरुवात होते. देशात सर्वात प्रथम केरळमध्ये पावसाचे आगमन होते. दरवर्षी मे अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला पावसाचे केरळमध्ये आगमन होते. पण यावेळी केरळमध्ये दहा दिवसाने उशिरा आगमन झाले. पण त्यानंतर वायू वादळ आले आणि या वायु वादळाने मान्सूनची दाणादाण उडविली. वायू वादळामुळे महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन लांबले आहे. हवामान खात्याने वेळोवेळी अंदात वर्तविले. मात्र हे सर्व अंदाज खोटे ठरले. अद्याप मान्सून मुंबईत आलेला नाही. मुंबईत पावसाचे आगमन झाल्यानंतर राज्यातील इतर भागात पाऊस पडतो. परंतु अद्याप मुंबईतही मान्सूनचे आगमन झालेले नाही. जून महिन्यातील मृग नक्षत्र संपत आलेले आहे. दरवर्षी ७० ते ८० टक्के पेरण्या मृग नक्षत्रात केल्या जातात. पण यावर्षी मृग कोरडा गेल्याने पेरण्या झाल्याच नाहीत. ग्रामीण भागात आजही पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यासाठी राज्य सरकारला मोठे काम करावे लागत आहे. गतवर्षी पडलेल्या दुष्काळामुळे शेतकर्याचे कंबरडे मोडले आहे. त्यात यावर्षीही अद्याप पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकर्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.