श्रीहरीकोटा: संपूर्ण देशवासीयांसह जगाचे लक्ष लागून राहिलेल्या इस्रोच्या चांद्रयान-२ चे आज यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. आज दुपारी २:४३ मिनिटांनी चंद्राच्या दिशेने झेपावले. गेल्या रविवारी मध्यरात्री नियोजित असलेले चांद्रयान-2 चे प्रक्षेपण तांत्रिक कारणामुळे स्थगित करण्यात आल्याने इस्रोच्या शास्रज्ञांसह देशवासीयांच्या मनात चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र आज हे यान नियोजित कार्यक्रमाप्रमाणे चंद्राच्या दिशेने यशस्वीरीत्या झेपावले आहे. यान यशस्वीपणे अवकाशात झेपावल्यानंतर शास्त्रज्ज्ञांसह देशवासियांनी एकच जल्लोष केला.
जीएसएलव्ही मार्क -३द्वारे चांद्रयान २चे यशस्वी प्रक्षेपण झालं. प्रक्षेपणानंतर अवघ्या काही मिनिटांतच यान पृथ्वीच्या कक्षेत पोहोचलं, अशी माहिती इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी दिली. चांद्रयान २मधील तांत्रिक समस्या दूर करून हे यान अंतराळात पाठवलं. अपेक्षेप्रमाणे चांद्रयान २ चे प्रक्षेपण उत्तम झालंय. इस्रोच्या टीमनं प्रचंड मेहनत घेतली. शास्त्रज्ञांच्या टीमला सलाम करतो, असंही सिवन म्हणाले.
काय आहेत चांद्रयान २ ची वैशिष्ट्ये ?
- चांद्रयान २ चे वजन ३.८ टन इतके आहे
- भविष्यातील अनेक मोहिमांसाठी चांद्रयान २ एक चांगलं उदाहरण ठरणार आहे
- या मोहिमेद्वारे भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवापर्यंत पोहचणार आहे. या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न अद्याप कुणीही केलेला नाही