औरंगाबाद – दिवाळीमध्ये एसटी आणि रेल्वेला होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा खासगी ट्रॅव्हल्स गैरफायदा घेत असल्याचे समोर आले आहे. औरंगाबादहून मुंबई, पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांकडून खासगी ट्रॅव्हल्स २००० ते २५०० हजार रुपये तिकीट वसूल करत आहे. या अव्वाच्या सव्वा दरवाढीने खासगी ट्रॅव्हल्स आपली तुंबडी भरत असताना त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही, असेच चित्र औरंगाबादमध्ये पाहायला मिळत आहे. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी तिकीटापेक्षा जास्त पैसे वसूली करणाऱ्यांविरोधात कारवाईचा इशारा दिला होता. परिवहन विभागाच्या नियमांना हरताळ फासण्याचे काम खासगी ट्रॅव्हल्स करत आहेत. परिवहन विभागाचे अधिकारी यांच्यावर कारवाई करणार की नाही, असा सवाल आता सामान्य प्रवाशी विचारत आहेत.
दिवाळीच्या सुट्यांमध्ये सर्वसामान्य नागरिक आपापल्या गावी किंवा पर्यटन स्थळी जाण्याचा बेत आखतात. एसटी आणि रेल्वेला होणारी गर्दी आणि आरक्षण न मिळाल्यामुळे प्रवाशांची पाऊले नाईलाजाने खासगी ट्रॅव्हल्सकडे वळत आहेत. मात्र औरंगाबादमधील ट्रॅव्हल्स कंपन्या दिवाळी सणात प्रवाशांचे दिवाळे काढत आहे. औरंगाबाद – मुंबई प्रवासासाठी साधारण ३५० ते ४०० रुपये तिकीट आकारले जाते. मात्र दिवाळीच्या काळात हिमालया ट्रॅव्हल्सने तब्बल २००० रुपये तिकीट दर आकारत प्रवाशांची लूट चालवली आहे. काही खासगी ट्रॅव्हल्सने तर २५०० रुपयांपर्यंत तिकीटदर वाढविले आहेत. खासगी ट्रॅव्हल्सवर कोणाचे नियंत्रण नाही का, असा सवाल संतप्त प्रवाशी विचारत आहेत.
या संदर्भात आम्ही परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशीही संपर्क करण्याचा
प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही. मात्र स्थानिक परिवहन विभाग या
ट्रॅव्हल्सच्या खाबूगिरीमध्ये सहभागी आहेत की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
















