मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर जनजागृती आवश्यक असून आता जनआंदोलन उभे करावे लागेल असे प्रतिपादन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले. मराठवाडा विभाग पाणीप्रश्न विचार आणि मंथन या पाणी परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या पुढाकाराने आयोजित पाणी परिषदेला सकाळी अकराच्या सुमारास प्रारंभ झाला. यावेळी माजी मंत्री अर्जुन खोतकर, आ. सतीश चव्हाण, आ. अंबादास दानवे आ. उदय सिंग राजपूत, महापौर नंदकुमार घोडेले माजी आमदार नितीन पाटील, माजी महापौर त्र्यंबक तुपे आदींची यावेळी उपस्थिती होती.
हॉटेल अमरप्रीत येथे या पाणी परिषदेचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, गेल्या चार-पाच दशकांपासून मराठवाड्याचा पाणी प्रश्न बिकट बनला आहे. सततचा दुष्काळ आणि अवर्षण यामुळे या विभागातील शेती अडचणीत आली आहे. या प्रश्नाचे महत्त्व कळावे यासाठी अशा पाणी परिषदेचे आयोजन करणे गरजेचे आहे. यापुढे पाणीप्रश्नावर जनआंदोलन उभे करावे लागेल, असेही ते म्हणाले. प्रारंभी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी विचार व्यक्त केले, ते म्हणाले की, पाणी हा जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. गेल्या वर्षीच्या दुष्काळाने शेती उद्ध्वस्त झाली होती. शेतकरी आर्थिक संपन्न संकटात सापडला होता. याहीवर्षी पावसाळ्याच्या प्रारंभी पाऊस नसल्याने दुष्काळाची परिस्थिती होती. परतीचा पाऊस नसला पडला नसता तर आपण याठिकाणी जमू शकलो असतो, का हाही प्रश्नच आहे. पाणीटंचाईची भीषणता मराठवाडा इतकी कोणत्याही विभागात नाही. त्यासाठी सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला सारत एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
केवळ एकाच मंत्र्यांची उपस्थिती
या पाणी परिषदेचे उद्घाटन पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार होते. तर मंत्री गुलाबराव पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, रोहयो राज्यमंत्री संजय बनसोडे, महसूल राज्य मंत्री अब्दुल सत्तार आदी सहा मंत्री या पाणी परिषदेला उपस्थित राहणार होते. मात्र दुपार पर्यंत केवळ मंत्री टोपे यांच्याशिवाय एकही मंत्री परिषदेला उपस्थित नव्हता.