औरंगाबाद : रेल्वेची चैन ओढून रेल्वे थांबविणे, विनापरवानगी रेल्वेस्थानक परिसर आणि रेल्वेत खाद्यपदार्थ विकणे, नो पार्किंगमध्ये रिक्षा उभ्या करणे, चांगलेच महागात पडले आहे. महिनाभरात अशा एकूण ३४८ जणांवर रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने कारवाई केली असून अशी कारवाई यापुढे सुरुच राहील अशी माहिती रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक अरविंद शर्मा यांनी दै. ‘सांजवार्ता’शी बोलताना दिली.
रेल्वेमध्ये विनापरवगी खाद्यपदार्थ विक्री करु नये, असे वारंवार रेल्वे विभागाकडून सांगण्यात येत असताना काही जण आदेशाला पाठ दाखवित सर्रासपणे अनधिकृतपणे खाद्यपदार्थ विक्री करत असल्याचे चित्र समोर आले आहे. जुलै महिन्यात रेल्वेस्थानकात आणि रेल्वेमध्ये विनापरवानगी खाद्यपदार्थ विकताना शंभर जण आढळून आले आहे. त्यांच्यावर आरपीएफने दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच नो पार्किंगमध्ये रिक्षा उभ्या करणार्यांवर आरपीएफने जुलै महिन्यात दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला आहे. एकूण ६० रिक्षाचालकांवर कारवाई केली आहे. तसेच विनाकारण रेल्वेस्थानक परिसरत फिरणार्या एकूण ३० तर रेल्वे चैन ओढून रेल्वे थांबविणारे एकूण चार जण आढळून आले आहेत. याशिवाय रेल्वेस्थानक परिसर आणि रेल्वेमध्ये कचरा करणार्यांवरही आरपीएफ पोलिसांनी कारवाई केली आहे. महिनाभरात १५० जण रेल्वे व रेल्वेस्थानक परिसरात कचरा करताना आढळून आले आहेत. यापुढेही असे कृत करणारे आढळून आले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक शर्मा यांनी स्पष्ट केले.
२ लाख १९ हजार रुपये दंड वसूल
स आरपीएफने महिनाभरात ३४८ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यात विनापरवानगी खाद्यपदार्थ विकणार्या शंभर जणांकडून १ लाख २० हजार रुपये तर नो पार्किंगमध्ये रिक्षा उभ्या करणार्या ६० जणांकडून ३० हजार रुपये दंड वसूल केला आहे. तसेच विनाकारण प्रवाशांना त्रास देणार्या चार जणांकडून ५ हजार रुपये दंड वसूल केला. याशिवाय रेल्वेस्थानकात विनाकारण फिरणर्या ३० जणांकडून ३० हजार रुपये दंड वसूल केला आहे. चैन ओढणार्या चार जणांकडून ४ हजार रुपये तर रेल्वेस्थानकात परिसरात कचरा पसरविणार्या १५० जणांकडून ३० हजार रुपये दंड वसूल केला. अशा महिनाभरात केलेल्या कारवाईत ३४८ जणांकडून एकूण २ लाख १९ हजार रुपये दंड आरपीएफने वसूल केला आहे.