औरंगाबाद: लोकसभा निवडणुकीचा टिपेला पोहचलेला ज्वर आता थंडावला आहे. एमआयएमचे आ. इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांचा निसटता पराभव केला. इम्तियाज जलील यांच्या विजयाने शहरातील बहुसंख्याक समाजामध्ये असुरक्षितेतची भावना आहे. अनेक ठिकाणी एमआयएमच्या कार्यकर्त्यांचा विजयी उन्माद देखील पाहायला मिळाला. यावर शिवसेना आतापर्यंत शांत होती मात्र, आता शिवसेना जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली असून विकासाबरोबरच हिंदुत्वाच्या रक्षणासाठी शिवसेना नेहमीच तत्पर राहील. त्यामुळे शहराती नागरिकांनी घाबरण्याचे काही कारण नाही असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अंबादास दानवे यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून शहरातील जनतेशी संवाद साधला, यावेळी विजयी झालेल्या उमेदवाराचा उत्साह मी समजू शकतो मात्र, या उत्साहाचे रूपांतर उन्मादात न होऊ देण्याची खबदारी घेण्याची जबाबदारी देखील त्यांची असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. ग्रामीण भागातून आम्हाला अनेक फोन आले. अनेकजण आता शहारत काय होईल अशी भीती व्यक्त करत होते. शहरातील काही भगिनींवर रंग फेकण्याचे प्रकार घडलेत. या सर्व प्रकारामुळे घाबरून जाण्याचे काही कारण नाही. हिंदुत्वाच्या मुद्यावर उभी असलेली शिवसेना हिंदुत्वाच्या रक्षणासाठी शहरातील तसेच ग्रामीण भागातील लोकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिल असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.