औरंगाबाद- वंचित बहुजन आघाडी ही काही बहुजनांची आघाडी नसून ही फक्त वंचित नेत्यांची आघाडी असल्याचा टोला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना लगावला आहे. त्यांनी आमच्यासोबत यावे असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रौप्य महोत्सवी नामविस्तार दिनानिमित्ताने ते शहरात आले असता माध्यमांशी बोलत होते.
केंद्र आणि राज्यातील भाजपच्या विकासात्मक कामगिरीवर समाधान व्यक्त करत सामाजिक न्यायमंत्री आठवले म्हणाले की, २०१४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच हवा होती आता २०१९ लाही मोदींच्या आणि भाजपने केलेल्या विकास कामांची हवा राहणार आहे. आणि नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान राहणार असल्याचा विश्वास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला. १० फेब्रुवारी रोजी औरंगाबादेत रिपाइं चा मराठवाडा स्तरीय भव्य मेळावा घेण्यात येणार असून मुख्यमंत्र्यांसह मराठवड्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्तीत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी रिपाइंचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम, मिलिंद शेळके, दौलत खरात, अरविंद अवसरमल,संजय ठोकळ, बाळकृष्ण इंगळे, पुंजाराम जाधव, दिलीप पाडमुख, विजय मगरे आदींची उपस्तीती होती
युतीमध्ये शिवसेनेचे अधिक नुकसान
राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये जगा वाटपाबाबत मोठा कलगीतुरा सुरू आहे. आपल्या खास काव्यशैलीत आठवले यांनी शिवसेनेचा समाचार घेत शिवसेने युतीधर्म पाळावा, जेवढे भाजपच्या विरोधात जाल तर त्यांचेच अधिक नुकसान होणार असल्याचे आठवलेंनी यावेळी शिवसेनेला आपल्या शैलीत ठणकावले













