नागपूर: आमचे सरकार आहे तोपर्यंत ओबीसींच्या हक्कांचे आम्ही प्रत्येक ठिकाणी संरक्षण करु त्यांचे आरक्षण तसेच इतर संधींवर कोणालाही घाला घालू देणार नाही, असे ठाम आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिले. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा आज तिसरा दिवस असून नागपूर येथून याला सुरुवात झाली. ही यात्रा दिवसभरात विदर्भातील मौदा, भंडारा, मोहाडी, तुमसर, तिरोडा आणि गोंदिया येथे जाणार आहे.
ओबीसींच्या लोकसंख्येचा अचूक आकडा सरकारकडे नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाला सांगितले आहे याबाबत नक्की वस्तुस्थिती काय या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही काय अध्यादेश काढलाय हे समजून न घेताच काही लोकांनी त्याच्यावर भाष्य केले आणि त्यासंदर्भात माध्यमांमध्ये बातम्याही प्रसारित झाल्या. मुळात राज्यात जिल्हा परिषदांमध्ये अनेक वर्षांपासून ओबीसींना २७ टक्के आरक्षण दिले जात आहे. एससी-एसटीचे आरक्षण हे लोकसंख्येनुसार संविधानाने दिले आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात संविधान स्पष्टपणे काही सांगत नाही त्यामुळे ते राज्यांवर सोडले आहे.