पैठण : जायकवाडी धरणाच्या वरील भागातील नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून २२ हजार ३४५ क्युसेक वेगाने गोदावरी नदीच्या पात्रात सोडलेले जात आहे. हे पाणी आज सायंकाळपर्यंत किंवा उद्या पहाटेपर्यंत पैठण येथील नाथसागर जलाशयात दाखल होईल.
जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात विशेषत: नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसाने गंगापूर, दारणा व अन्य धरणातील पाणीपातळी वाढली असून, या धरणातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. हेे पाणी नांदूर मधमेश्वर पीकअप वेअरमध्ये दाखल होत आहे. तेथून काल २२ हजार ३४५ क्युसेक या वेगाने पाणी गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आले आहे. सदरील सोडलेले पाणी हे नागमठाण येथे १७ हजार ३०५ क्युसेकने दाखल होत असल्याने नाथसागर जलाशयात किती पाणी दाखल होईल हे सांगता येत नाही. दरम्यान, काल जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात २१ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून नाथसागर जलाशयाच्या पाणीपातळीत फक्त०.०७९ द.ल.घ.मी.वाढ झाली असल्याचे धरण सूत्रांनी सांगितले आहे. सध्या जायकवाडी धरणात ३२२ क्युसेक इतके पाणी दाखल होत आहे. काल पैठण तालुक्यातील बहुतेक गावात पाऊस झाला. आज दुपारी पुन्हा पाऊस सुरू झाला आहे.