नवी दिल्ली: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी दिल्ली येथे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांची भेट घेतली. ईव्हीएम विषयी त्यांनी आपले गाऱ्हाणे मांडले. निवडणूक आयोगाकडून मला शून्य अपेक्षा आहे. कारण त्यांच्याशी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर जे काही हावभाव होते त्यावरूनच हे लक्षात येत होतं की त्यांना आमच्या बोलण्यात काहीही स्वारस्य नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलं. तसंच मी बॅलेट पेपरची मागणी केली आहे. मी औपचारिकता म्हणूनच भेट घेतली आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. मॅच फिक्स असेल तर तयारी करण्याला काय अर्थ आहे असंही राज ठाकरेंनी विचारलं आहे.
बॅलेट व्होटींगवर निवडणूक आयोगाने यावं अशी आमची मागणी होती. मात्र त्यांच्याकडून शून्य अपेक्षा आहेत एक औपचारिकता म्हणून आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे. उद्या कोणी हे म्हणायला नको की बॅलेट पेपरची मागणी होती तर राज ठाकरे निवडणूक आयोगाकडे का गेले नाहीत? औपचारिकता असल्याने ही भेट घेतली आहे. निवडणूक आयोग आमचं ऐकेल, आमच्या मागणीचा विचार होईल असं वाटत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.